🌼🌼🌼श्रीमद ग्रंथराज दासबोध आणि त्याचे निरुपण..!!!🌼🌼🌼
||प्रत्येक माणूस स्वभावाने वेगळा का असतो?||
||प्रत्येक माणूस स्वभावाने वेगळा का असतो?||
माणूस म्हणून सगळी माणसे सारखी असतात. पण प्रत्येक जण आपल्या परीने वेगळा असतो. माणसाच्या निराळेपणात एक सामान्य तत्व असते. भारतीय तत्वज्ञानी कपिलाचार्य सांगतात की सर्व दृश्य विश्व सत्व, रज, तम या त्रिगुणांनी व पंचमहाभूतांनी बनलेले आहे. तर माणूसही त्रिगुणात्मक आहे। प्रत्येक माणसात तीनही गुण एकत्र असतात. परंतु त्यातील एक गुण इतर दोन गुणांपेक्षा वरचढ असतो. त्या गुणांची लक्षणे त्या माणसात दिसतात. समर्थांनी सत्व रज तमोगुणांचा माणसात दिसणारा परिणाम सांगितला आहे. सत्व गुणाने माणसात भगवत भक्ती निर्माण होते, रजोगुणाने पुनरावृती म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते. तमोगुणाने माणूस खालच्या योनीत जातो. गीतेत १४ व्या अध्यायात १८ व्या श्लोकात भगवंत म्हणतात, सत्व गुणी माणसे श्रेष्ठ गतीला जातात, रजोगुणी मध्ये राहतात, तमोगुणी खाली जातात।
*****************************
*****************************
१. रजोगुण:-- आपण बरे आपला संसार बरा, आपल चांगल असाव, मिळाल तर दुस-याचही घ्याव, असा रजोगुण असतो. धनधान्याची साठवण करतो, द्रव्याची त्याला आसक्ती असते, कृपणता असते. तृष्णा रजोगुणाचा स्वभाव असतो संसाराची आसक्ती असते, दुस-यासारखे वैभव आपलेही असावे असे वाटते, ते मिळाले नाही तर दु:खी होतो. तो दुस-याची टवाळी करतो, थट्टा करतो, निंदा करतो, त्याच्या बोलण्याने वाद होतो, अंमल किंवा धुंदी आणणा-या पदार्थांवर प्रेम असते. देहाला, इंद्रियांना सुख देण्याच्या मागे असल्याने भक्ती, वैराग्य आवडत नाहीत. देवाचे कार्य करायला लाज वाटते, पण प्रपंचा साठी खूप कष्ट घेतो. रजोगुणा मुळे वासना प्रपंचात गुंतते. ती सुटण्यासाठी काय करावे असे श्रोत्यानी विचारताच समर्थ म्हणतात: उपाय एक भगवद भक्ती। जरी ठाकेना विरक्ती। तरी यथानुशक्ती। भजन करावे।।२-५–३६।।
*****************************
*****************************
२. तमोगुण:-- तमोगुणी माणसात शबल रजोगुणी माणसाचे सगळे गुण असतात, पण त्यांचे वैशिष्ठ्य असे की प्रत्येक ठिकाणी अतिशयोक्ती असते. मनाच्या श्लोकातील ६४ व्या श्लोकात तमोगुणाचे सुंदर वर्णन समर्थांनी केले आहे। तमोगुणी अतिशय लोभी असतो, त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर परमावधीचा संताप येतो, क्रोध आला की आई, बाप, भाऊ, बहीण कोणालाही ओळखत नाही, नेहमी विषयात गुरफटलेला असतो, दुस-याच्या दु:खाने संतोष होतो, लोकांमध्ये भांडण लावून देण्यात त्याला मजा वाटते. दुस-याची त्याला दया येत नाही. देवाची निंदा करतो कारण वासनेत अडकलेला असतो. समर्थांनी तमोगुणाचे वर्णन करण्याचे कारण तमोगुण अधोगतीला नेतो. तो सोडून द्यावा.
*****************************
*****************************
३. सत्वगुण:-- सत्वगुणाने भगवंताची भक्ती, ज्ञानाची प्राप्ती, सायोज्यमुक्ती मिळते म्हणून सत्वगूण अंगी बाणवायचा प्रयत्न करावा लागतो. सत्वगुण अज्ञानाचा नाश करतो, परमार्थाचा मार्ग दिसायला लागतो, ईश्वरावरचे प्रेम, विवेकी वृती, परमार्थाची आवड, हरिकथेची आवड, ही सत्वगुणाची महत्वाची लक्षणे आहेत. सत्वगुणाने दु:खाचा विसर पडतो, भक्तिमार्ग स्पष्ट दिसतो. सत्वगुणाचे थोडक्यात वर्णन असे श्रोत्यानी विचारताच समर्थ म्हणतात: परपीडेचे वाहे दु:ख। परसंतोषाचे सुख। वैराग्य देखोनी हरिख। मानी तो सत्वगुण।।२-७-८३।। आता असो हे बहूत। देवीधर्मी ज्याचे चित्त। भजे कामना रहित। तो सत्वगुण।।२-७-८५।।
*****************************
*****************************
प्रत्येक गुणाचे दोन प्रकार आहेत.
१ शुध्द आणि २. शबल
१ शुध्द आणि २. शबल
विदुराच्या शुध्द सत्व गुणामुळे तो द्युत होऊ नये म्हणून दुर्योधनाला उपदेश करत राहिला, तर धर्मराजाचा सत्वगुण मलिन झाल्यामुळे तो द्युत खेळायला बसला। जीवनातील गतीमानता रजोगुण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती देव, देश, धर्म यांच्या उत्कर्षासाठी कार्य करते तेव्हा तो शुध्द रजोगुण, तर फक्त संसार, मी, माझा व्यवसाय, माझी मुले, यांचा विचार करतो तो शबल रजोगुण। युध्द खेळणे व पहाणे हा तमोगुण. श्रीरामांनी वाली, रावणाबरोबर युध्द केल ते दुष्टांचा नाश करण्यासाठी, म्हणून तो शुध्द तमोगुण. इतर सर्व तमोगुणी लक्षणे शबल तमोगुणाची।
*****************************
*****************************
रामकृष्ण परमहंस सत्व, तम व रजो गुणांची संसारी माणसातील लक्षणे सांगतात: सत्वगुणी संसारी माणूस शांत शालीन दयाळू, आतबाहेर एक असलेला, फारशा कामना, वासना नसलेला असतो. संसारी रजोगुणी माणूस घरात सर्व साफ सफाई करणार, घराला रंग रंगोटी करणार, वेगवेगळे छान पोशाख करणार, थाटमाट करणारा असतो। संसारी तमोगुणी काम, क्रोध मत्सर, अंहकार झोपेनी व्याप्त असतो। भक्तीत सुध्दा सत्व, रज, तम गुण दिसतात. सत्व गुणी भक्त एकांतात ध्यान करतो, शरीरावर त्याची फारशी ममता नसते, जीभेचे चोचले नसतात, डामडौल नसतो, सामानाचे प्रदर्शन नसते. रजोगुणी भक्त कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, मधून सोन्याचे मणी, असा थाट करणारा असतो. तमोगुणी भक्ताचा ईश्वरावरील विश्वास जळजळीत असतो।
***************************
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
***************************
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
।।श्री राम जय राम जय जय राम।।
No comments:
Post a Comment